सालाबादाप्रमाणे मोखाडा तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत हिरवे - घानवळच्या घानवळ गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा...
मोखाडा प्रतिनिधी - रामदास गाडर
मोखाडा - मोखाडा तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत हिरवे - घानवळच्या घानवळ गावाला पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे या वर्षीही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे सुरू झाले आहे.
एकीकडे आपण डिजिटल आणि आधुनिक भारताचे स्वप्न बघत असताना घानवळ गावचे नागरिक मात्र पाणी टंचाईच्या भीषण समस्येसोबत झगडत आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवापर्यंत घानवळवासीय चांगले रस्ते,पाणी, रोजगार आणि आरोग्य सुविधा यांच्या प्रतीक्षेत आहेत. गावचे नागरिक,माता - भगिनी हंडाभर पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी दोन कि.मी.ची पायपीट करत असून विहिरींनी देखील पाण्याचा तळ गाठला आहे. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव दूषित पाणी प्यावे लागत आहे. घानवळ गावची पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडावण्यासाठी हिरवे - घानवळ ग्रुपग्रामपंचायतचे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पुढाकार घेताना दिसून येत नाही.त्यामुळे ही पाणी टंचाई घानवळवासियांच्या पाचवीलाच पुजली आहे असेच म्हणावे लागेल.
आदिवासी भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी शासन प्रत्येक वर्षी लाखो - करोडोंचा निधी देत असताना हा निधी नक्की मुरतो कुठे ? हा प्रश्न यानिमित्ताने कायम अनुत्तरितच राहतो आहे. घानवळवासीय ही पाणी टंचाई कधी कायमची संपेल असा प्रश्न नागरिक ग्रामपंचायत आणि तालुका प्रशासनाकडे विचारत आहे. आता हा संवेदनशील आणि मूलभूत प्रश्न प्रशासन कधी सोडणार आहे ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 टिप्पण्या